स्मशानभूमीचा पंधरा वर्षापासूनचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही; वादग्रस्त स्थळी जाऊन राजाभाई केणींनी केली पहाणी
अलिबाग, प्रतिनिधी ता. 31: कुर्डुस ग्रामपंचायत हद्दीतील नवखार ग्रामस्थांच्या पिढ्यानपिढ्याच्या स्मशानभूमीच्या जागेवर गावातीलच एका कुटुंबाने दावा केला आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ असतानाही या कुटुंबाकडून राजकीय वक्तव्य केली जात आहेत. याची प्रत्यक्ष पहाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी शनिवार (ता.31) रोजी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन केली. यात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. नवखार ग्रामस्थांच्या स्मशानभूमीच्या जागेवर पिंगळे कुटुंबिय दावा करीत असल्याने गावामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, अशा परिस्थितीत अलिबाग- मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी ही जागा ग्रामस्थांना परत मिळवून देण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिलेली आहे.
कोणत्याही स्थितीत अशा कठिण प्रसंगी शिवसेना कुर्डुस ग्रामस्थांच्या पाठीशी राहिल असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी दिला आहे. शनिवारी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी हे प्रत्यक्ष पहाणीसाठी पोयनाड पोलिसांच्या समक्ष गेले होते. यावेळी नवखार ग्रामस्थांनी पिंगळे कुटुंबियाच्या षढ़यंत्राची कथाच वाचून दाखवली. या एका कुटुंबियांनी संपुर्ण गावाला कशा प्रकारे वेठीस धरले आहे, याचीही माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. नवखार येथील सर्व्हे क्रमांक 191 मध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली स्मशानभूमी आहे.
या ठिकाणी एक धर्मशाळा, एक थडगे आणि स्मशानभूमी आहे, याचबरोबर ही जागा गावकीच्या कायम वहिवाटीखाली राहिलेली आहे. या स्माशानभूमीकडे जाण्यासाठी शासकीय निधीतून रस्ता तयार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इतरही निधी या ठिकाणी खर्च झाल्याची माहिती गावपंच देतात, तसे लेखी पुरावेही गावपंचाकडे आहेत. जुन्या पिकपाणी उताऱ्यातही या ठिकाणी स्मशानभूमी असल्याचे पुरावे गाव पंचाकडे आहेत. गावातील सर्व वयोवृद्ध व्यक्तींच्या म्हणण्यानुसार याच ठिकाणी नवखार ग्रामस्थांनी स्मशानभूमी असल्याचे म्हणणे आहे. मात्र, ही जागा एका कुळाच्या नावे होती, ती जागा पिंगळे कुटुंबियांनी खरेदी केल्यानंतर हा स्मशानभूमीचा वाद निर्माण झाला.
ही जागा ग्रामस्थ मंडळाच्या नावे करावी यासाठी ग्रामस्थांनी गावातील छाया पिंगळे व चंद्रकांत पिंगळे या कुटुंबियांबरोबर साठेकरार केला होता; परंतु पिंगळे कुटुंबिय रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रर कार्यालयात हजरच राहिले नाहीत. यासाठी पिंगळे कुटुंबियांना स्मशानभूमीच्या जागेसाठी 3 लाख रुपये दिले होते. मात्र, पिंगळे कुटुंबिय ग्रामस्थ मंडळाच्या नावे जागा करुन देण्यासाठी टाळाटाळ करु लागल्याने 2015 मध्ये नगखार ग्रामस्थ न्यायालयात गेले. तेव्हापासून हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना दोन दिवसांपूर्वी छाया पिंगळे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून राजकीय वक्तव्य करत पुन्हा वाद निर्माण केला आहे. अलिबाग- मुरुडचे आमदार महेंद्र दळवी आणि त्यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या विरोधात राजकीय हेतूने गंभीर आरोप करीत आहेत.
हे आरोप खोटारडे असून केवळ राजकीय वाद निर्माण करण्यासाठी हा न्यायप्रविष्ठ विषय चव्हाट्यावर आणला जात आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळे झालेल्या गावकीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी नवखार आणि समस्थ कुर्डुस विभागातील नागरिकांच्या पाठीशी शिवसेना खंबीर उभी असून असे कितीही संकटे आली तरी त्यात्यातून मार्ग काढले जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी राजाभाईंनी नवखार ग्रामस्थांच्या एकजुटीचेही कौतुक केले.